भरून येतात डोळे, दाटून येतो कंठ
पण शब्दांना आता, आवाज नाही माझ्या
आयुष्याची कमाई, चारशे स्क्वेअर फुट फक्त्
सुखांना यायला घरात, जागा नाही माझ्या
त्यांच्या अपेक्षा मोठ्या, तिच्या मागण्या छोट्या
माझ्याच स्वप्नांना इथे, जगात वाव नाही माझ्या
चार आण्याची नोकरी, आठ आण्याची जिंदगी
आयुष्यात रुपया कधी, आलाच नाही माझ्या
दोन वित पोटासाठी, विकली जिंदगी मी
उधार जगण्याला आता, अंत नाही माझ्या
सुन्न घामेजलेली गर्दी, अन कोमेजलेली मनं
बधीर पळणार्या पायांना, ठाव नाही माझ्या
त्यांचा झाला रास्तारोको, यांनी थांबवली रेल्वे
दोन दिवस् घरात चुल, पेटली नाही माझ्या
शिवाजी पार्कवर गर्दी, बोलणारे नेतेही दर्दी,
पण त्या मेंढरांना व्यथांची, जाण नाही माझ्या
लावला लिलाव वेड्यांनी, मजबूर लाचारीचा माझ्या
मग कळाले अस्तित्वाचा, काहीच भाव नाही माझ्या
घातल्या गोळ्या मुर्खांनी, मिटवायला नाव माझे
रक्ताच्या थेंबाला तसाही, कुठेच गाव नाही माझ्या
कधी फुटला बाँब, केव्हा जळाला डबा
प्रेताला अजून इथे, नाव नाही माझ्या
कशी झाली चौकशी, कोणी दिला दाखला
मरणाला कसा कुठलाच, पुरावा नाही माझ्या
कधी झालो मुंबईकर, कधी मिटली ओळख
मरून देखील प्रश्नाला, उत्तर नाही माझ्या
कोणी दिला राजीनामा, कोणी मिळवली पद्के
पण कोणलाही मरणाची, खंत नाही माझ्या
कोणी काढली रॅली, दिल्या चॅनेल्सना बाईटस
दाखवला कळवळा त्याचा, मरणाशी संबंध नाही माझ्या
कुठे गेली मदत, कुठे सहानुभुती त्यांची
पोरक्या घराला कोणीच, वाली नाही माझ्या
बांधली स्मारके त्यांची, ज्यांची मोठी नावे
सामान्यतेचा एकही, कुठेच चिरा नाही माझ्या
बेगडी त्यांची तत्वं, खोट्या त्यांच्या आशा
एक मत सोडून कशालाच, अर्थ नाही माझ्या
गुमान जगणं इथे, मरणं देखील बेनाम
जिवंतपणी कधी लक्षात, आलंच नाही माझ्या
किमंतु
आनंदऋतू प्रकाशन
0 comments:
टिप्पणी पोस्ट करा